“जगन्नाथ, आमचा राष्ट्रीय कवि तुला माहित आहे ना ?”

“भारती ना ? सुब्रह्मण्यं भारती.”

“हो. त्याने लहान मुलाला एका गाण्यांत काय सांगितले आहे, आहे माहीत ?”

“काय सांगितले आहे ?”

“बाळ, दारांत कावळा येईल, चिमणी येईल. तुझी करमणूक करायला येतील. त्यांना खडे नको मारूं, त्यांना दाणे टाक हो बाळ; भाकरीचा तुकडा टाक हो. आणि मनी माऊ तुझ्या दुधाभोवती म्यांव म्यांव करील. तिला काठी नको मारूं. तिला घाल हो दूध. आईजवळ हट्ट धर तिला दूध घालण्यासाठी. आणि गाईचें वांसरूं हंबरेल. तूं जाऊन त्याला थोपट. त्याच्यासारखा चपळ हो हो राजा; आणि मोत्या तुला चाटायला येईल. त्याच्या तोंडात भाकरीचा तुकडा दे हो. आणि दारी शेवंती फुलेल; मोगरा फुलेल; तुळस डोलेल. त्यांना तुझा लहान गडू घेऊन पाणी घाल हो. फुलपांखराला दुरून बघ. त्याचे पंख नको हो तोडूं. प्राणी चतुर असतात, त्यांना दो-याने नको हो बांधू. असे आहे ते गाणें. छान आहे नाही जगन्नाथ ?”

“हो, खरेच छान आहे.”

“तूं महाराष्ट्रात गेल्यावर महाराष्ट्रांतील मुलांना तें शिकव. इंदिरेच्या पुढें होणा-या मुलाबाळांस शिकव.”

“कावेरी, मी सदैव तुझ्याबरोबर आहे. तूं माझे महाराष्ट्र, तूं हिंदुस्थान, तूं स्वर्ग. तूं मोक्ष. कां मला पुन: पुन्हां दुस-या आठवणी करून देतेस ?”

“जगन्नाथ, मन अनंत आहे. जीवनांतील सा-या स्मृति तेथें असतात. त्या केव्हां जोर करून वर येतील व इतर स्मृतींना गुदमरवतील त्याचा नेम नाही. एक दिवस इंदिरा उसळून तुझ्या हृदयसागराच्या तळांतून वर येईल व कावेरी व हा प्रेमानंद तळाला जाऊन बसतील.”

तेथे गवतावर बाळ झोपला होता. धरित्रीच्या कुशींत. हिरव्या गालिचावर. माता. जीवनांत, या संसारात कंटाळून गेलेल्या जीवाला, दगदग व वणवण करून थकून गेलेल्या जीवाला धरित्रीमाताच शेवटीं जवळ घेते. ती लहानांना जवळ घेते, मोठ्यांना जवळ घेते. मानवी मातेला मोठ्या मुलाला जवळ घेण्यांत संकोच वाटतो. परंतु भूमाता सर्वांना लहान थोरांना, रावारंकांना, स्त्रीपुरूषांना, बालवृद्धांना, पापात्म्यांना, पुण्यात्म्यांना, सर्वांना जवळ घेते. तिची अनंत पांखर सर्वांवर आहे. तिची हिरवी शालजोडी सर्वांसाठी. तिची फुलें सर्वांसाठी. ती सर्वांना झोपवतें. वारे वारा घालतात. पाखरें गाणी म्हणतात. सा-यांना ती विश्रांति देते.”

“किती छान दिसतो आहे प्रेमा ! हिरव्या गवतावरचें जणुं पांढरें पांढरें फूल !”

“माझ्या कुशीतल्यापेक्षां तो भूमातेच्या कुशीतच छान दिसतो. नाही ?”

“काय बोलतेस कावेरी ?”

“काय म्हटलें मी ?”

“मी नाही त्याचा उच्चार करीत.”

“प्रेमाच्या राज्यांत सारें सुंदर व मंगल वाटतें ना ? जीवन मरण दोन्ही लाटाच. दोन्हीहि गोड.”

हिंडत हिंडत दोघें उत्तरेकडे चालली.

“कावेरी, आपण महाराष्ट्र व मद्रासच्या सीमेवर आलो. सोलापूर जिल्ह्यांत आतां आपण शिरूं. वरच हिंडत आलो. मलबार किनारा राहिला.”

“मलबार राहिला हें बरें झाले. मलबारचे सृष्टिसौंदर्य पाहतास तर तूं वेडा झाला असतास. आणि तुझे पा. आपोआप महाराष्ट्राकडेच वळले. आंतील अनंत सुप्त मन तुला महाराष्ट्राकडे खेचीत आहे. जीवनातील गुप्त अंत:प्रवाह महाराष्ट्राकडे जात आहे. जगन्नाथ, महाराष्ट्रांतील नद्या मद्रासकडे धांवत आल्या, परंतु त्या मागे नाही वळल्या. कृष्णा, गोदावरींनी मद्रासला माळ घातली. तूं मद्रासला माळ घालून परत कोठें चाललास ? प्रवाह मागे कसा चालला ? परंतु मनुष्य उगमाकडे जात असतो. पंचमहाभूतांतून आला, पंचमहाभूतांत जातो. ईश्वराकडून आला, ईश्वराकडून जातो. महाराष्ट्रांतील पुन्हां महाराष्ट्राकडे जातो. होय ना ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to गोड शेवट


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
 भवानी तलवारीचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
भारताची महान'राज'रत्ने
अजरामर कथा
वाड्याचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा