गुणा गेल्यापासून जगन्नाथचे कशातहि लक्ष लागेना, ना खाण्यापिण्यांत, ना अभ्यासात, ना हिंडण्याफिरण्यांत, ना संगीतांत. तो आपल्या खेलींत बसे; जणुं पंख तुटलेला पक्षी, पिसारा गळून गेलेला मोर!

मॅट्रिकच्या परिक्षेस तो बसला. परंतु नापास झाला. त्याने आतां शाळा सोडली. पुढे काय करायचे हा प्रश्न होता. आयुष्याचे काय करायचे?

राहून राहून त्याच्या मनात हिंदुस्थानभर हिंडावे असे येई. गुणाहि कदाचित् भेटेल, कोठे तरी आढळेल; गुणाला घेऊन परत येऊ असे त्याला वाटे, परंतु आईबापांना सोडून जाण्याचे त्याला धैर्य होईना. तो खेड्यापाड्यांतून हिंडू लागला, शेतक-यांची स्थिति पाहू लागला, तो गावोगाव जाई, शेतक-यांत बसे, त्यांची दु:खे ऐके, त्यांचे प्रश्न पाही. सावकाराचा मुलगा, परंतु आपणांत येतो, बसतो, आपल्या सुखदु:खाशीं एकरूप होतो, याचे त्यांना कौतुक वाटे. शेतक-यांना कौतुक वाटे. परंतु भावांना राग येई; त्यांची भांडणे होत, कलागती होत.

शेवटी हे सारे भाऊ वेगळे झाले. त्यांचे हिस्से पडले. शेतीवाडी, सावकारी सारी वाटली गेली; जगन्नाथच्या वाट्याला ५० हजारांची सावकारी, रोख दहा हजार रुपये, शिवाय जडजवाहीर, दागदागिने, शिवाय शेतीवाडी, काही घरे, असे आले होते. गुणाचे घर त्यांनीच लिलावात घेतले होते, त्या घरांत धन आहे असे वडील भावास वाटत होते; परंतु जगन्नाथचा हट्ट की ते घर आपल्यासच मिळावे म्हणून. शेवटी ते त्याला देण्यांत आले.

वडिलोपार्जित घरी मोठा भाऊ राहू लागला, जगन्नाथ दुस-या एका घरी राहायला गेला; आईबाप अर्थात त्याच्याजवळ राहिले. लहान मुलाला सोडून ते कोठे राहणार?

जगन्नाथने गुणाचे सारे घर झाडून काढले. गुणा कधी आला तर घर स्वच्छ असावे. रोज आपला गडी पाठवून ते घर तो झाडून ठेवी. गुणाची जी खोली होती, त्या खोलीत त्याने गुणाचा एक वाढवलेला मोठा सुंदर फोटो लावला; तेथे एक सुंदर बैठक घाचलेली असे, त्या फोटोला तो फुलांचा हार घाली. एरंडोलला असला म्हणजे जगन्नाथ गुणाच्या घरी गेल्याशिवाय रहात नसे. कधी कधी रात्री जाई व गुणाच्या फोटोसमोर गाणे म्हणे. ते गाणे वारा गुणाकडे घेऊन जाईल का? वा-याला भावना असतील, तो सहृदय असेल तर नेईल ते गान व गुणाला अर्पील.

शिरपूरहून जगन्नाथची पत्नी आता एरंडोलला आणावी असे जगन्नाथचे आईबाप म्हणू लागले. येणा-या-जाणा-यांजवळ ते तसे बोलत. वास्तविक जगन्नाथ फार मोठा नव्हता, वीस वर्षांचा असेल, परंतु जुन्या ठरवलेल्या लग्नांत पुष्कळदा हीच अडचण येते, मुलगी लवकर प्रौढ होते, परंतु मुलगा तितका प्रौढ होत नाही. जगन्नाथची पत्नी पंधरा-सोळा वर्षांची होती, परंतु जगन्नाथचे अद्याप वाढण्यांचे वय होते. घर सोडून जाण्याचे विचार त्याच्या मनांत अधिकच बळावले.

इतक्यांत एके दिवशी वर्तमानपत्रांत एक बातमी आली. दयाराम भारती हुकूमबंदी मोडून पुन्हा खानदेशांत आले, त्यामुळे त्यांना पकडण्यांत येऊन त्यांना धुळे जेलमध्ये स्थानबद्ध करून ठेवण्यांत आले आहे, अशी ती बातमी होती. ती बातमी जगन्नाथने पुन: पुन्हा वाचली. दयाराम आले, ते धुळे तुरुंगात आहेत, आपण त्यांना भेटून यावे असे त्याच्या मनात आले. त्यांना काय काय बरोबर न्यावे याचा तो विचार करीत होता. वह्या, पेन्सिल, झरणी, काही पुस्तके नेऊन द्यावी असे त्याच्या मनांत आले. काही फळे न्यावी, मळ्यांतील मोसंबी न्यावी, केळी न्यावी असे त्याला वाटले. त्याची खिन्नता कमी झाली, तो आनंदला.

“आई, मी धुळ्याला जाऊन येणार आहे. “ जगन्नाथ म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to गोड शेवट


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
 भवानी तलवारीचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
भारताची महान'राज'रत्ने
अजरामर कथा
वाड्याचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा