सासरी किती सुख असले तरी माहेरची आठवण यावयाचीच. माहेरच्या वर्णनाच्या ओव्या अति सहृदय आहेत. आई म्हणते :

माहेरा आलीस             रहावे चार मास
येऊं दे थोडे मांस             अंगावरी ॥

आईला मुलगी सुकून गेलेली दिसायची. माहेराहून कोणी येईल याची सासुरवाशीण वाट पहात असते :

पाऊस पाण्याची            धरणी माय वाट पाहे
तशी मला आस आहे             माहेराची ॥

माहेरचा रस्ता कितीही वाईट असला तरी तो मृदू वाटतो. सासरचा कितीही चांगला असला तरी वाईट असतो :

माहेरच्या वाटे             मऊ गार हरीक दाटे
सासरच्या वाटे                 टोंचती कुचकुच काटे ॥

हरिकाचे गवत थंडगार व मऊ असते. माहेरी गेल्यावर आई म्हणते, “दुधावरची साय घे, कलमी आंबा खा, लौकर उठू नको, नीज अजून.” परंतु माहेरीही ती कामे करते.

जाईन माहेरा             बाप्पाजींच्या घरा
घुसळीन डेरा                 अमृताचा ॥

माहेरी भावाजवळ गोष्टी सांगते, आईच्या हाताचे गोड जेवण जेवते. माहेरचे पाणीही अमृतासारखे वाटते :

जेवण मी जेवी             जेवण जेवत्यें पोळीचे
पाणी माहेरच्या गांवीचें             गोड लागे ॥

माहेरी गेल्यावर तिला जणू पवित्र तीर्थक्षेत्री आल्यासारखे वाटते.

बाप तो ईश्वर             मायबाई काशी
नंदी आहे पायापाशी             भाईराया ॥

शेजारीणबाईसंबंधीच्या ओव्याही मोठया समर्पक व गोड आहेत. पुष्कळसे सुखदु:ख शेजारी माणसे कशी असतात यावर अवलंबून असते. माहेराहून आलेली, सासरी कोण ओळखीचे नाही. अशा वेळेस शेजारीण बाई जर चांगली असली तर किती आधार वाटतो :

शेजारिणी बाई             तुझा शेजार चांगला
नाही मला आठवला             मायबाप ॥
शेजारिणी बाई             धन्य तुझ्या शेजाराची
सय नाही माहेराची             बारा वर्षे ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to स्त्रीजीवन


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
अजरामर कथा
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
सापळा
पैलतीराच्या गोष्टी
खुनाची वेळ
गांवाकडच्या गोष्टी
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
लोकभ्रमाच्या दंतकथा