जे. डी . पराडकर

आयुष्यात ज्याला कृतज्ञ या शब्दाचा अर्थ कळतो , त्याचा जीवनप्रवास नक्कीच सुखकर आणि आनंदी होतो . कृतज्ञ असण्यासाठी आपले विचार आणि संस्कार योग्य असायला हवेत . माणूस संस्कारातून अनेक गोष्टी शिकत जातो . हे संस्कार एखाद्या फळाप्रमाणे जेंव्हा परिपक्व होतात त्यावेळी त्यातून कृतज्ञचे दर्शन होवू लागते . जीवनात कृतज्ञ होणे कधीही अभिमानास्पद , मात्र कृतघ्न होणे अत्यंत वेदनादायी आहे . सध्याच्या काळात मात्र कृतज्ञतेचे कमी आणि कृतघ्नपणाचे अनुभव अधिक येवू लागले आहेत . कृतज्ञ आणि कृतघ्न या दोन शब्दांमध्ये पहिली दोन अक्षरे सारखीच आहेत त्यामुळे शब्दात काहीसे साम्य वाटत असले तरी , तिसरे अक्षर पुढे आल्यानंतर दोन्ही शब्दातील अर्थाची खरी उकल होते. कृतज्ञता कळायला खूप वेळ लागतो तद्वत कृतघ्नपणा मात्र चटकन कळून येतो . प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या कडून कृतज्ञतेची अपेक्षा करत असते , मात्र ती आपल्यात असेल तरच आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करु शकतो .*



                      कोणतीही व्यक्ती जन्मतः कृतघ्न नसते . परिस्थिती त्या व्यक्तीला कृतघ्न बनवते असे चित्र बऱ्याचदा दिसून येते . माणूस स्वतःला बंधनात ठेवत नाही , मात्र तो आपल्या जवळच्या माणसांना बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो . स्वतःवर बंधन घालून घेणे ज्यांना जमले त्यांच्यावर कृतघ्न होण्याची वेळ चुकूनही येत नाही . बंधन घालण्याचे काम संस्कार करत असतात . बालपणापासून प्रत्येकावर योग्य संस्कार करण्याचे काम प्रथम आई आणि नंतर अन्य मंडळी करतात . वय वाढत जावून मनावरचा ताबा उडाला तर , संस्कार आणि बंधनांचा टीकाव लागत नाही आणि तेथेच कृतघ्नपणाचा शिरकाव होवू लागतो . कृतघ्न होणे हे त्या व्यक्तीसाठी अथवा त्याच्या घराण्यासाठी नक्कीच शोभादायक नाही . या उलट कृतज्ञ होणे आनंदाची अनुभूती देणारे आहे . विचार आणि हेतू शुध्द असेल तर , कृतघ्न होण्यापासून स्वतःला दूर ठेवता येते . सध्याच्या काळात वाढत्या गरजा आणि कमी मिळकत या विषमतेमुळे अपेक्षित नसलेल्या विश्वासू माणसांकडूनही कृतघ्नपणाचे अनुभव येतात . अत्यंत विश्वासातील आणि जवळची माणसं ज्यावेळी स्वतःच्या स्वार्थापोटी कृतघ्न बनतात त्यावेळी विश्वास या शब्दाचीच होळी होवून जाते .



                        जोडले जाणारे संबंध हे स्वार्थासाठी असू नयेत . स्वार्थच माणसाला कृतघ्न बनवतो . मन समाधानी असेल तर , स्वार्थापासून दूर राहणे सहज शक्य होते . मैत्री , विश्वास या तशा टीकणाऱ्या गोष्टी नाहीत . पवित्र आणि शुद्ध स्वरुपाची मैत्री ही अपवादानेच पाहायला मिळते . मैत्री स्वार्थावर आधारीत असेल तर , कालांतराने कृतघ्नपणाची अनुभूती आपोआप येते . सध्याच्या काळात परस्परातील नाती दुरावू लागली असतांना मैत्रीतील शुध्दता कोणत्या मापाने मोजायची ? हा खरा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे . मैत्री मैत्री असे म्हणून साहानुभूती मिळवायची आणि परिस्थिती पालटल्यावर स्नेह विसरुन जायचं अशा स्वरुपाची मैत्री अधिक क्लेशकारक असते . यातूनच कृतज्ञते ऐवजी कृतघ्नपणाचा अनुभव येतो . 



कृतज्ञता हा स्वभावातील नम्रपणाचा भाग आहे . सध्या सय्यमा अभावी क्रोधातीत स्वभाव मोठे नुकसान करण्यास कारणीभूत ठरत आहे . मतभेद मनभेदापर्यंत पोहचले की , नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि अनेक वर्षे जपलेली कृतज्ञता अल्पावधीतच कृतघ्नपणात बदलते . असे कटू अनुभव प्रत्येकाला आपल्या जीवनप्रवासात येत असतात . ज्याला व्यवहार पारदर्शक , अचूक आणि विश्वासार्ह पध्दतीने ठेवता येतो त्याचे गणित कधीही चुकत नाही . या ऊलट ज्याला व्यवहाराचे गणित केवळ स्वतःच्या लाभाएवढेच सोडवता येते त्याला व्यवहाराची दुसरी बाजू कळत नाही , अथवा कळत असूनही तो ती न कळल्यासारखी दाखवतो . 



कृतघ्नपणाचे अनुभव येवू नयेत म्हणून अधिकाधिक व्यवहार्य वागणे उचित ठरते . आपले व्यवहार्य वागणे कदाचित समोरच्या व्यक्तीला मान्य होइलच असे नाही . मात्र भविष्यात येणारे कटू अनुभव टाळण्यासाठी व्यवहारी असणे योग्य ठरते . अनेकदा माणसाच्या स्वभावाचा देखील लाभ उठवला जातो . साधा सरळ स्वभाव योग्य खरा मात्र याला व्यवहार्यतेची जोड नसेल तर , फसगत होण्याची शक्यता अधिक असते . कृतघ्नपणाचे दुख: होते आणि कृतज्ञतेमुळे मानसिक समाधान लाभते . जीवनात काय मिळवायचे , हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असते . आपली वैचारीक बैठक ठाम असेल तर , दुख: करण्याचे प्रसंग येत नाहीत . कृतज्ञतेने व्यक्तीमत्वच नव्हे तर , जग जिंकता येते . कृतज्ञतेची अपेक्षा दुसऱ्याकडून करण्याआधी तो आपल्यात किती आहे ? याचे आत्मपरीक्षण केले तर अनेक प्रश्न आपोआप सुटतील . 

दैनंदिन जीवनात मानसशास्त्रीय दृष्टीने विचार केला की , अनेक प्रश्न सहज सुटतात . प्रश्न निर्माण करण्याऐवजी ते सोडविण्यावर अधिकाधिक भर द्यायला हवा . यासाठी नकारात्मकता संपवून टाकणे आवश्यक असते . नकारात्मक विचारांनी प्रगती ऐवजी अधोगतीच होते . सकारात्मक वृत्ती स्थैर्य , शांतता आणि समृध्दी देते . अखेरीस कोणते विचार अंगीकारायचे ? यावरच आपली पुढील वाटचाल ठरत असते . कृतज्ञ हा शब्द पत्राच्या अखेरीस अभिमानाने वापरला जातो . याऊलट कृतघ्न हा शब्द लेखनात दुसऱ्यासाठी  वापरून स्वतः मात्र कृतज्ञ असल्याचे भाव मनात ठेवले जातात . आपल्यातील कृतज्ञता आपणच सांगायची नाही तर , ती समोरच्याकडून कौतूकास पात्र व्हायला हवी .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to प्रेरणादायी गोष्टी 5


चिमणरावांचे चर्हाट
खडका कोथिंबिरीची गोष्ट
त्या वळणावरचा पाऊस
खलील जिब्रानच्या निवडक कथा
ठकास महाठक
धडा
आत्मविश्वासाने भाषण कसे कराल?? महत्वाच्या टिप्स
भूतकथा भाग १
बाधा
दुष्टाचे औदार्य
तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करुन घ्यायचीय का?
प्रेरणा
टाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग
प्रेरणादायी गोष्टी 8
काश्मीर प्रिन्सेस विमान दुर्घटना : सत्यकथा